Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजला आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी आणि जळगाव जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
संजय राऊतांची टीका :
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी थेट आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त आपत्ती घडल्या आहेत.”
“शेतकऱ्यांना हवी असलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निदान आता त्यांना जगण्यापुरती तरी काहीतरी मदत मिळावी. प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी. कर्जमाफीची घोषणा नंतर करावी”, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut | मुख्यमंत्री दिसत असले तरी मदतीचे काय झाले? :
“देशाच्या गृहमंत्र्यांनी अशावेळी पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं महत्त्वाचं असतं. पण ते उंटावरुन शेळ्या हाकतात. शाह हे क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका, बिहारमधील निवडणुकीचा प्रचार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष कोण असेल हे ठरवण्यात व्यस्त आहेत, पण ते पूरग्रस्त संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी गेले नाहीत. मुख्यमंत्री दिसत असले तरी मदतीचे काय झाले?” असा सवालही राऊतांनी केला.
राऊतांनी सरकारच्या आर्थिक खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार-खासदार विकत घ्यायला आणि निवडणुका लढवायला सरकारकडे प्रचंड पैसा आहे. कंटेनर भरून पैसे आहेत, काही जागा अंडरग्राऊंड ठेवल्या असतील. पीएम केअर फंडात बेहिशोबी कोटी रुपये आहेत, पण त्याचा हिशोब कोणाकडे नाही. हा पैसा तुम्ही निवडणुकीत सिक्रेट फंड म्हणून वापरणार आहात का?” असा थेट सवाल राऊतांनी केला.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली होती. ही मदत पंचनामे पूर्ण करून दिवाळीच्या आधी देण्यात येईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.






