Rain Update | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या (सायक्लोनिक सर्क्युलेशन) प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला असून, १३ ऑगस्टपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर बुधवारी मुसळधार पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी, विशेषतः १४ ते १६ ऑगस्टदरम्यान, जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी विशेष धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी तर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, जे येथील परिस्थितीची गांभीर्य दर्शवते.
१४ ऑगस्ट रोजी कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही (१५ ऑगस्ट) राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे सावट कायम राहणार आहे. मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर विदर्भातील अनेक भागांमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, वीकेंडमध्ये फिरण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठीही हा अतिवृष्टीचा इशारा काळजीपूर्वक विचारात घेण्यासारखा आहे.
हवामान विभागाकडून आवाहन
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा धोका कायम आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. विदर्भातील गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे वाहतुकीत अडथळे येण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
News Title- Weather Department Issues Red and Yellow Alerts for 3 Districts






