Ragasa cyclone | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘रागासा’ नावाचे (Ragasa cyclone) चक्रीवादळ वेगाने विदर्भाच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट (Rain Yellow & Orange Alert) जारी केला आहे. आधीच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘रागासा’ चक्रीवादळामुळे (Ragasa cyclone) हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरपासूनच विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन-चार दिवस जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांची वाढली चिंता :
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे अनेक भागांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. आता ‘रागासा’ चक्रीवादळाचा (Ragasa cyclone) फटका बसल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व धान पिकांसाठी हा पाऊस हानीकारक ठरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातही या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो. पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याची, तसेच सखल भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Ragasa cyclone | प्रशासनाची तयारी व नागरिकांना इशारा :
नागपूर (Nagpur) हवामान केंद्राने हा पाऊस परतीच्या मान्सूनचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या मान्सून अजूनही मध्य भारत व विदर्भात सक्रिय असून, ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी ‘रागासा’ चक्रीवादळाचा मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच प्रशासनाला संभाव्य पूरस्थिती व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी, नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.






