Cyclone Montha | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मोंथा वादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार हजेरी लागल्याने दिवाळीचा सणही पावसातच ओला गेला. आता मोंथा वादळामुळे हवामानात पुन्हा बदल झाला असून समुद्र खवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने नागरिकांना तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने खबरदारीचा उपाय म्हणून जलवाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील मच्छिमारांनी बोटी किनाऱ्यावरच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Cyclone Montha | हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत सावध पावले :
मोंथा वादळाच्या प्रभावामुळे मुंबई परिसरात समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मांडवा–गेटवे ऑफ इंडिया मार्गावरील सर्व बोटींचे संचालन तात्पुरते बंद ठेवले आहे. तथापि, ‘मालदार कॅप्टन’ ही बोट मर्यादित स्वरूपात सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, हवामान विभागाने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागानुसार अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि वीजांच्या कडकडाटासह सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, शेतकरी चिंतेत :
कोकणात (Kokan) पावसाने पुन्हा जोर धरला असून चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक झालेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर वाळत ठेवलेले भात पीक पावसात भिजल्याने पूर्णपणे कुसायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भात शेती वाचवणे हे आता त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.
शेतकऱ्यांनी या नुकसानीबद्दल सरकारकडे मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना आणि मच्छिमारांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






