Health Care | ‘लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. पण आजच्या डिजिटल युगात ही म्हण जणू विसरली गेली आहे. रात्री उशीरा झोपणे ही अनेकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. अभ्यास, ऑफिसचे काम, टीव्ही सीरिज किंवा मोबाईल स्क्रोलिंग या कारणांमुळे लोक रात्री २-३ वाजेपर्यंत जागतात. मात्र, ही सवय शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरते. वेळेवर झोप न घेतल्यास शरीराचा सर्केडियन रिदम बिघडतो, ज्यामुळे मेंदू आणि शरीराचे नैसर्गिक कामकाज विस्कळीत होते.
काय होईल रात्र उशिरा झोपलात तर?
रात्री उशीरा झोपल्यास शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही. आपण झोपेत असताना मेंदू दिवसभराचा ताणतणाव कमी करतो, पेशींची दुरुस्ती होते आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. परंतु उशीरा झोपल्याने ही प्रक्रिया अपूर्ण राहते. परिणामी सकाळी उठल्यावर थकवा, डोकेदुखी, चिडचिडेपणा आणि लक्ष केंद्रित न होणे यासारखे त्रास जाणवतात. झोपेअभावी शरीरात ‘कॉर्टिसोल’ या ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
अनेक अभ्यासकांनुसार, उशीरा झोपण्याची सवय इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. शरीरातील इन्सुलिने नीट काम न केल्याने साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो. तसेच झोपेअभावी मेटाबॉलिझम मंदावतो, ज्यामुळे वजन वाढते आणि पोटाभोवती चरबी साचते. रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, त्यामुळे वारंवार सर्दी, थकवा किंवा इतर लहान आजार जाणवतात. त्वचाही निस्तेज दिसते आणि चेहऱ्यावर काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) दिसू लागतात.
Health Care | वेळेत झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक
शरीराला उत्तम विश्रांती आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी वेळेवर झोप घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोप घेणे आदर्श मानले जाते. या काळात मेलाटोनिन नावाचा हार्मोन सर्वाधिक प्रमाणात स्रवतो, जो झोपेची गुणवत्ता सुधारतो आणि शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतो. पुरेशी झोप घेतल्यास मेंदू ताजातवाना राहतो, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.
उशीरा झोपण्याची सवय टाळण्यासाठी झोपेची ठरलेली वेळ ठेवा. झोपण्याच्या एक तास आधी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपपासून दूर राहा. हलका व्यायाम, ध्यान किंवा पुस्तक वाचन यामुळे मन शांत होते आणि झोप लागण्यास मदत होते. नियमित झोपेची सवय लावल्यास मानसिक ताण कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, रात्री उशीरा झोपणे ही केवळ सवय नाही, तर ती शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम करणारी जीवनशैली बनू शकते. वेळेत झोप घेऊन, शरीराला आवश्यक विश्रांती दिल्यास केवळ आरोग्यच नाही, तर एकाग्रता, मनःशांती आणि उत्पादकता देखील वाढते. म्हणूनच आजपासूनच ‘लवकर निजे, लवकर उठे’ या म्हणीचा खरा अर्थ आचरणात आणा.






