Chakan News | चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात चोरांनी उच्छाद मांडला असून, एकापाठोपाठ होणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ २४ तासांत अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एका दिवसात सहा ठिकाणी धाडसी चोऱ्या
शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) सह शेलगाव, भोसे, रासे आणि वडगाव घेणंद या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २४ तासांच्या आत आणि ३०० मीटरच्या परिसरातच दोन मोठ्या घरफोड्यांसह चोरीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या अंधाराचा आणि भरदिवसाच्या वेळेचाही फायदा उचलत आपला डाव साधला आहे.
या घटनांमध्ये चोरट्यांनी अंदाजे ३५ ते ४० तोळे सोन्या-चांदीचे दागिने, लाखो रुपयांची रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. सोमवारी मध्यरात्री शेलगाव येथील श्री. दत्त हायटेक नर्सरी, विजयानंद आवटे यांचे किराणा दुकान आणि भगवान झरेकर यांच्या घरात चोरी झाली. त्यानंतर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास श्री. लोणारी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ऐवज चोरण्यात आला.
पोलिसांचा केवळ पंचनामा, नागरिकांमध्ये संताप
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या धाडसी चोऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. चोरटे मोकाटपणे फिरत असताना पोलीस केवळ घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.
या घटनांमुळे पोलिसांचा धाकच उरला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवून या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






