Ladki Bahin Yojana | दसरा मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. योजना थांबणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लाडकी बहीण योजना बंद (Ladki Bahin Yojana) होणार नाही, उलट ती सुरूच राहणार आहे”. यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेतून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील ६५ वर्षांखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, काही ठिकाणी पात्रतेशिवाय लाभ घेणाऱ्यांची नावे आढळल्याने सरकारने अलीकडेच लाभार्थ्यांचा फेरआढावा सुरू केला होता. यामुळे योजना थांबणार असल्याची भीती निर्माण झाली होती.
योजनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप :
शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना महिलांच्या या योजनेवर कोणतेही संकट नसल्याचं ठामपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण ही योजना सरकारची महिलांना दिलेली बांधिलकी आहे. गरीब कुटुंबातील बहिणींना आर्थिक आधार देण्याचा आमचा उद्देश आहे आणि तो कायम राहील.” त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
मात्र, या घोषणेसोबतच शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल देखील केला. “उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं. आपल्या पक्षातील नेत्यांवर कारस्थान करून ते कटप्रमुख बनले आहेत, पक्षप्रमुख नाहीत,” असे टोमणे त्यांनी लगावले.
Ladki Bahin Yojana | सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं :
त्याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “फडणवीस वरून खाली आले, पण उद्धव तुम्ही घरात बसून वर गेलात. तुमच्यासारखा रंग बदलणारा नेता मी कधीच पाहिला नाही,” असा आरोप शिंदेंनी केला.
विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत असून, ती बंद होण्याच्या अफवा पसरवत असल्याचं शिंदे यांनी सूचित केलं. मात्र, सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यामुळेच ही योजना सुरळीतपणे सुरू राहील, असा त्यांनी पुनरुच्चार केला.
दसरा मेळाव्यातील शिंदेंच्या या घोषणेमुळे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. “लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” या हमीमुळे लाभार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महिलांसाठी आश्वासक ठरली आहे.






