Bharat Gogawale | राज्यातील गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याच्या भावाला सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाने या प्रकरणावरून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शिंदे गटातील नेतेदेखील आता सावध भूमिकेत आले आहेत.
निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या टोळीवर मोठी कारवाई सुरू केली आहे. अलीकडेच पुणे आणि अहिल्यानगरमधील दोन घरांवर छापेमारी करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या हाती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कागदपत्रं आणि काही जिवंत काडतूस देखील लागली. या पार्श्वभूमीवरच सचिन घायवळकडे रिव्हॉल्व्हर परवाना असल्याचं उघड झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
“योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला, चौकशी होणार” — भरत गोगावले :
या प्रकरणी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोगावले म्हणाले, “काल आम्ही बातम्यांमधून हे ऐकलं आहे. पण या प्रकरणाची आम्हाला सखोल चौकशी करावी लागेल. मला सर्व तपशील माहित नाहीत. राज्यमंत्र्यावर आरोप झाले आहेत, त्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करतील.”
या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण आतापर्यंत शिंदे गटाने कदमांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र, भरत गोगावले यांनी चौकशीची घोषणा केल्याने गटात अंतर्गत संभ्रम असल्याचं दिसून येत आहे.
Bharat Gogawale | ठाकरे गटाचा आक्रमक मोर्चा, शिंदे गट बचावात :
या वादामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की, “गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला परवाना देणं म्हणजे कायद्याचा गैरवापर आहे. सरकार गुंडांना शस्त्र देतंय, नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.”
दुसरीकडे, शिंदे गट बचावात्मक भूमिकेत आला असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं, “सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ (Sachin Ghaiwal) यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिल्यामुळे नियमानुसार शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला.”
या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत देखील प्रतिक्रिया दिली. “आमची मागणी आहे की विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावं. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि अडथळे दूर करून लवकरच निर्णय घेतला जाईल,” असं त्यांनी सांगितलं.






