Pune : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातात. मात्र, शेकोटी पेटवताना त्यात इंधन म्हणून टायरसारख्या घातक पदार्थांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होऊ शकतात. टायर जाळल्याने त्यातून अनेक घातक आणि विषारी घटक बाहेर पडतात, जे श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास जीवघेणे ठरू शकतात.
किमान तापमान १२ अंशांवर
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune) थंडीची लाट आली असून, किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली घसरले होते. परिणामी, थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या. दुर्दैवाने, यातील अनेक शेकोट्यांमध्ये लाकडाऐवजी टायरचा इंधन म्हणून वापर करण्यात आला. टायर जळाल्यामुळे निर्माण झालेला विषारी धूर परिसरात पसरल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला.
टायर जाळल्यास…
टायर जाळल्याने त्यातून अत्यंत घातक आणि विषारी प्रदूषके बाहेर पडतात. यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड आणि बाष्पनशील सेंद्रिय संयुगे (VOCs) यांचा समावेश होतो. हे विषारी घटक त्वचा, डोळे, श्वसनसंस्था आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांना आमंत्रण देतात. हे आजार कमी कालावधीसाठी किंवा दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात.
शेकोटीत हे वापरू नका; धोका टाळा!
प्लास्टिक: प्लास्टिक जाळल्याने त्यातून डायऑक्सिन आणि फ्युरान्ससारखे घातक वायू बाहेर पडतात.
टायर: टायरमध्ये अतिशय घातक, विषारी आणि धोकादायक घटक असतात.
कपडे: कपडे जाळल्याने मिथेन वायू बाहेर पडून प्रदूषण होते.
श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात, “ज्यांना दमा, अस्थमा आहे, त्यांच्यासाठी टायर जाळल्याने निर्माण होणारा धूर अत्यंत घातक ठरू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात शेकोटी पेटवताना टायर, प्लास्टिक यांसारखे घातक पदार्थ जाळणे टाळायला हवे.”
… तर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो
टायर जाळणे आणि त्यातून निघणारा विषारी धूर ही चिंतेची बाब आहे. यासंदर्भात त्वरित नियमन करणे गरजेचे आहे. कायदेशीर कारवाईचा विचार करता, टायर जाळणाऱ्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ (शासकीय आदेशाचा अवमान) अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. याशिवाय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील अशा व्यक्तींवर कारवाई करू शकते.
म्हणूनच, हिवाळ्यात शेकोटीचा आनंद घेताना ती पर्यावरणपूरक आणि आरोग्याला घातक ठरणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लाकूड, गोवऱ्या यांसारख्या नैसर्गिक इंधनाचा वापर करावा आणि टायर, प्लास्टिक यांसारखे घातक पदार्थ जाळणे टाळावे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमच्या परळीत प्राजक्ता ताई…’; सुरेश धसांनी सगळंच सांगितलं
बीडमध्ये गुन्हेगारीचा महापूर! तब्ब्ल ‘इतक्या’ जणांकडे शस्त्र परवाना?
राज्यावर पावसाचं सावट! ‘या’ तारखेला अवकाळी पावसासह गारपीट होणार?






