Ayush Komkar Murder Case | पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीत आरोपींना हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी प्रमुख आरोपी बंडू आंदेकरला (Bandu andekar) थेट गुढघ्यावर बसवले, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली.
न्यायालयीन सुनावणीदरम्यानची घडामोड :
आयुष कोमकर हत्या प्रकरणात एकूण १३ आरोपी आहेत. त्यापैकी आठ आरोपींना काल कोर्टात आणण्यात आले होते. यात आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांचा समावेश होता. कोर्टात हजर झाल्यानंतर सर्व आरोपींना दोन गुडघ्यांवर बसण्यास सांगण्यात आले. मात्र वयस्कर असल्याने बंडू आंदेकर मांडी घालून बसले होते. पोलिसांनी त्यांना गुढघ्यावर बसण्यास सक्ती केली आणि आंदेकर अखेरीस गुढघ्यावर बसले. (Ayush Komkar Murder Case)
सुनावणीदरम्यान बंडू आंदेकर यांनी स्वतःचा बचाव करताना सांगितले की, “आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे. हत्येच्या दिवशी आम्ही केरळमध्ये होतो. मी माझ्या नातवाचा खून का करू? तो माझा वैरी नव्हता. वनराज आंदेकर नगरसेवक होता आणि युथ आयकॉन होता, त्यामुळे त्याचा खून केला गेला असावा.” त्यांचा वकीलही कोर्टात हा मुद्दा ठळकपणे मांडत होता.
Ayush Komkar Murder Case | पोलिसांचा युक्तिवाद :
पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आंदेकर कुटुंबाने मिळून हा खूनाचा कट रचला आहे. या टोळी युद्धात गोळीबारासाठी शस्त्र कुठून आणले गेले, तसेच हत्येनंतर आरोपींनी वापरलेले कपडे कुठे लपवले याचा तपास करणे आवश्यक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अमन पठाण आणि यश पाटील यांनी फक्त बंडू आणि विष्णू आंदेकर (Vishnu Andekar) यांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे तपासासाठी पोलिस कोठडी गरजेची आहे.
पोलिसांनी न्यायालयाला विनंती करताना सांगितले की, तपास पूर्ण करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर या प्रकरणात पुढील चौकशी सुरू होणार आहे.






