Asia Cup 2025 | क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया कप 2025 च्या आयोजनावर अखेर शिक्कामोर्तब झालं असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार हे निश्चित झाले आहे. ही स्पर्धा ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस सुरुवातीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सहभागी होण्यास नकार दिला होता, मात्र नंतर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती नोंदवत सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीत ACC आणि BCCI यांच्यात सहमतीने दुबई आणि अबू धाबी येथे ही स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. (Asia Cup 2025)
भारत-पाकिस्तान एकाच गटात; सामन्याची खात्री :
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही ग्रुप-A मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गट टप्प्यातच या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना होणार आहे. स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून, प्रत्येकी चार अशा दोन गटांमध्ये त्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर-४ टप्प्यात पोहोचतील.
ग्रुप-A मध्ये भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात आणि हाँगकाँग या संघांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर ग्रुप-B मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान हे संघ असतील. यामुळे या स्पर्धेत स्पर्धात्मकतेचा आणि रोमांचकतेचा उत्कर्ष पाहायला मिळणार आहे. (Asia Cup 2025)
Asia Cup 2025 | दुबई आणि अबू धाबी ठरले संभाव्य यजमान :
दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आणि अबू धाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियम हे दोन प्रमुख स्टेडियम आशिया कप 2025 साठी वापरण्यात येणार आहेत. BCCI आणि अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात याबाबत करार झाला असून अंतिम तारखा आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांमधील राजकीय तणावामुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाणार असल्याचे आधीपासून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआय सरकारची अंतिम मंजुरीही घेत आहे. BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करतील.






