Amruta Rao | ‘विवाह’ आणि ‘इश्क विश्क’ यांसारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) हिने तिच्या व्यावसायिक आयुष्यातील एका विचित्र अनुभवाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान, तिने आपल्यावर कोणीतरी काळी जादू केल्याचा दावा केला, ज्यामुळे तिच्या करिअरला मोठे नुकसान सोसावे लागले होते.
गुरुंचे भाकीत आणि काळ्या जादूचा संशय
अमृताने (Amrita Rao) अलीकडेच रणबीर अलाहबादियाच्या (Ranveer Allahbadia) पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना तिने सांगितले की, एका काळात तिच्या गुरूने तिच्या आईला फोन करून तिच्या मुलीवर कोणीतरी काळी जादू केली असल्याचे सांगितले. सुरुवातीला या गोष्टींवर विश्वास नसला तरी, आपल्या गुरूवरील श्रद्धेमुळे आपल्याला ते पटले, असे अमृता म्हणाली.
तिने पुढे सांगितले की, “मला माहित आहे की माझे गुरू पूर्णपणे निःस्वार्थी आहेत आणि ते नेहमी सत्यच सांगतात. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मला जाणवले की कदाचित माझ्यासोबत काहीतरी नकारात्मक घडत आहे.” इंडस्ट्रीमध्ये काळी जादू अस्तित्वात असल्याचे आपण इतर अभिनेत्रींकडून ऐकले होते, पण प्रत्यक्ष अनुभव येईल असे वाटले नव्हते, असेही तिने नमूद केले.
Amrita Rao | करिअरमधील विचित्र योगायोग
आपल्या आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल बोलताना अमृता म्हणाली की, तिला थेट काळ्या जादूचा अनुभव आला नाही, परंतु तिच्यासोबत काही अत्यंत विचित्र आणि नकारात्मक घटना घडल्या. तिने सांगितले, “मी तीन मोठे चित्रपट साइन केले होते, जे मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे होते. मी त्यांची साइनिंग रक्कमही घेतली होती.”
त्या वर्षी घडलेली सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे, ते तिन्ही चित्रपट काही कारणास्तव कधीच बनू शकले नाहीत आणि ते प्रकल्प अचानक रखडले. त्यामुळे तिला घेतलेली आगाऊ रक्कम परत करावी लागली. आपल्यासोबत घडलेला हा अनुभव खूपच विचित्र होता आणि त्याचा संबंध कदाचित त्या काळ्या जादूशी असावा, असा खुलासा अभिनेत्रीने केला. ‘अब के बरस’मधून पदार्पण करणारी अमृता, २०१६ मध्ये आरजे अनमोलसोबत (RJ Anmol) विवाहबद्ध झाल्यानंतर काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती आणि आता ‘जॉली एलएल बी-३’ (Jolly LLB 3) मधून ती पुनरागमन करत आहे.






