Ajit Pawar Plane Crash | 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विशेषतः विमानात 5 लोक होते की 6, याबाबत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. काही नेत्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणीही केली होती. मात्र आता प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून या प्रकरणातील महत्त्वाचं सत्य समोर आलं आहे.
बारामती विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटे आधी विमान कोसळून मोठा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं होतं. तरीही “विमानात सहा जण होते, मग एक मृतदेह कुठे गेला?” असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. आता या संशयाला उत्तर देणारी माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून पुढे आली आहे.
विमानात 6 जण असल्याचा संशय :
अपघातानंतर विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात दोन पायलट, अजित पवार, एक एअर होस्टेस आणि त्यांचा एक अंगरक्षक असे एकूण पाच जण प्रवास करत होते. मात्र काही नेत्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार सहा जण असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या अपघाताबाबत संशयाचे ढग अधिकच गडद झाले होते.
या पार्श्वभूमीवर गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी घटनास्थळी पाहिलेलं सविस्तर वर्णन करत नेमकी परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विमान गावाच्या बाजूने घिरट्या घालत उतरण्याचा प्रयत्न करत होतं आणि अचानक ते एका बाजूला झुकून धावपट्टीजवळ कोसळलं.
Ajit Pawar Plane Crash | प्रत्यक्षदर्शींनी सांगितला नेमका आकडा :
कल्याण आटोळे यांनी सांगितलं की, विमान कोसळल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एक व्यक्ती विमानातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती, दरवाजा थोडासा उघडलेला होता आणि तिचा पाय बाहेर दिसत होता. मात्र गावातील एका व्यक्तीने संभाव्य स्फोटाचा धोका सांगितल्याने ते मागे सरले आणि काही क्षणांतच मोठा स्फोट झाला. (Ajit Pawar Plane Crash)
यानंतर परिसरात शोध घेत असताना डाव्या बाजूला एक मृतदेह दिसला, तर उजव्या बाजूला अजित पवार यांचे अंगरक्षक पडलेले होते. आतमध्ये आणखी तीन मृतदेह होते. स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टर वापरून विमानाचा भाग तोडून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावरून विमानात एकूण पाचच लोक होते, असा स्पष्ट निष्कर्ष प्रत्यक्षदर्शींनी मांडला आहे.






