Ajit Pawar Plane Crash | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या दुर्घटनेमागची कारणे शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली असून गेल्या ४८ तासांत या विमानाने तीन वेळा प्रवास केल्याचे उघड झाले आहे. (Ajit Pawar Plane Crash News)
तसेच या विमानाचे शेवटचे ऑडिट फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले होते आणि विमानाचा परवाना २०२८ पर्यंत वैध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड, हवामानाची परिस्थिती आणि मानवी चुका या तिन्ही बाबींच्या शक्यतेवर तपास सुरू आहे.
धुक्यात लँडिंगचा प्रयत्न आणि वैमानिकाची चूक? :
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीला पोहोचल्यानंतर दाट धुक्यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे वैमानिकाने एकदा ‘गो-अराउंड’ करत लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. दुसऱ्या वेळी एटीसीने वैमानिकाला स्वतःच्या निर्णयावर लँडिंग करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगण्यात येत आहे.
धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंगचा प्रयत्न केल्याने विमान खड्ड्यात आदळले आणि भीषण अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वैमानिकाच्या निर्णयावरही आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Ajit Pawar Plane Crash | वर्षभरापूर्वी ऑडिट, ब्लॅक बॉक्स हाती :
या विमान कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाचा १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विमानतळावरही अपघात झाला होता. त्यावेळी मोठी जीवितहानी टळली होती, मात्र डीजीसीएने केवळ तंबी देऊन कंपनीला सोडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे यावेळी कठोर कारवाई झाली असती, तर आजची दुर्घटना टळली असती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Ajit Pawar AiroPlane News)
दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तो डिकोड करण्यात येणार आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती मिळणार आहे, तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे शेवटच्या क्षणांतील संभाषण स्पष्ट होणार आहे. हा डेटा उलगडण्यासाठी किमान ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.






