Ajit Pawar | राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या लक्षात घेऊन सरकार लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांमुळे राज्याला खरी समृद्धी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य पातळीवरून तोडगा काढला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असून उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होईल.
10 एचपी कृषिपंपांचे वीजबिल माफीवर विचार :
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी 10 अश्वशक्ती क्षमतेच्या कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली. यावर अजित पवार म्हणाले की, ही मागणी न्याय्य असून मर्यादित प्रमाणात असे पंप असतील तर त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निश्चित तोडगा काढला जाईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही, असे ते म्हणाले.
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही शेतकऱ्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “मी स्वतः द्राक्ष बागायतदार असल्याने तुमचे प्रश्न माझ्यासाठी घरचेच आहेत. राज्य कृषी विभाग उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.”
Ajit Pawar | बाजारपेठ आणि पारदर्शकतेवर भर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात देशांतर्गत बाजारपेठेवर अधिक लक्ष देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या करवाढीचा फटका भारतीय कृषी उत्पादनांना बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात तयार होणाऱ्या उत्पादनांची खरेदी भारतीय ग्राहकांनी करावी, यासाठी जनजागृती केली जात आहे.






